Tuesday 29 January, 2008

वळू (Valu - The Wild Bull)


२६ जानेवारी. छानपैकी सहल काढावी का दिवसभर निवांत लोळून संध्याकाळी मग ‘डोक्याला-ताप-नाही’ छाप हिंदी सिनेमा हाणावा या विवंचनेत बरीचशी डोकी गुंतलेली. अशा वेळी सकाळचं झेंडावंदन झाल्यावर माझी पावले ‘वळू’ची तिकीटे काढायला कोथरूड सिटी प्राईड कडे वळतात.

‘वळू’. ‘सकाळ’मध्ये एका मराठी चित्रपटाची जाहिरात अख्खा आठवडाभर पाहून मन आधीच सुखावलेलं. आणि शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशी तर चक्क अर्धा पानभर रंगीत जाहिरात!! मराठी चित्रपट पुण्यात एकावेळी सात ठिकाणी प्रदर्शित होऊन किती वर्षे लोटली असतील? मुंबईत बारा चित्रपटगृहात आणि महाराष्ट्रात १७-१८ शहरांतून एका वेळी प्रदर्शित होण्याचे भाग्य निदान अलीकडच्या कोणा मराठी चित्रपटाला लाभले असेल असे वाटत नाही. ही बहुदा सुभाष घईंच्या मुक्ता आर्टसची किमया. मुक्ता आर्टसने वितरीत केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट.

माझी उत्सुकता केवळ यामुळे नव्ह्ती. FTII चा विद्यार्थी उमेश कुलकर्णीच्या या पहिल्या दिग्दर्शन प्रयत्नाबद्द्ल पेपरात वेळोवेळी वाचलेलं होतं. Pune International Film Festival 2008 मध्ये Best Director चा सन्मान आणि मग Holand च्या Rotterdam International Film Festival मध्ये लागलेली वर्णी यामुळे ही कुतुहल होतं.

गेली काही वर्षे मराठी सिनेमा multiplex मध्ये बघायचा तर तो छोट्यात छोट्या hall मध्ये बसून. पण ‘वळू’ चक्क मोठ्या hall मध्ये लागलेला आणि तरीही housefull झालेला पाहुन सुखद धक्का बसला.



पण मुख्य चित्रपटाचं काय? अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, ज्योती सुभाष अशी तगडी नटमंडळी असली म्हणजे अभिनयाबद्दल वादच नको. पण तरी पडद्यामागची सगळी टीम नवीन; त्यामुळे धाकधुक होती. मात्र ‘वळू’ने अपेक्षाभंग केला नाही.

पहिल्या काही मिनिटांतच जाणवले की चित्रपटाची तांत्रिक अंगे अगदी उच्च दर्जाची नसली तरी पुरेशी सफ़ाईदार आहेत. मुख्य म्हणजे संकलन (editing). अजून देखील ब-याच मराठी चित्रपटांत संकलनाची बोंब असते. मग पडद्यावरचे कलाकार किती का आटापिटा करोत. साध्य होतो तो फ़क्त रसभंग. इथे तो प्रश्न नसल्याचे पाहून चित्रपटाचा आनंद घ्यायचा मार्ग मोकळा झाला.

कथा अगदी सहज सोपी. आड-वळणं नसलेली. एका खेड्यात देवाच्या नावाने सोडलेला बैल (हाच वळू) बिथरतो आणि त्याला पकडायला म्हणून एका वनाधिका-याला गावात पाचारण केले जाते. तो आल्यावर गावातल्या वेगवेगळ्या माणसांच्या वैयक्तिक आणि संपूर्ण गावाच्या एकत्रिक प्रतिक्रियेचं चित्रण म्हणजेच हा चित्रपट. माणसांच्या वागण्या-बोलण्यातील विसंगतीवर सहजपणे बोट ठेवत अगदी खुमासदार शैलीत कथा पुढे सरकते. द. मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांची एखादी कथा वाचत असल्याचा भास होत रहातो.

या कथेला न्याय द्यायचा तर १-२ प्रमुख पात्रांवर अवलंबुन न राहता गावातलं एक एक व्यक्तिमत्व अनेक बारकाव्यांसह उभे करणं आवश्यक होतं. त्यात दिग्दर्शकाला चांगलंच यश आलंय. छोट्या छोट्या प्रसंगातून एकेक व्यक्तिमत्व उठाव घेत जातं. विशेषत: जीवन (गिरीश कुलकर्णी), आबा (नंदु माधव), सांगी (अमृता सुभाष), सखुबाई (ज्योती सुभाष), सौ. भटजी (निर्मिती सावंत), सरपंच (मोहन आगाशे), सौ. सरपंच (भारती आचरेकर), तानी (विणा जामकर), सत्या (सतीश तारे) या व्यक्तिरेखा अगदी ठसठशीतपणे समोर येतात.

त्यामानाने स्वानंद गड्ड्मवारची व्यक्तिरेखा तेवढी एकसंध वाटत नाही (का अतुल कुलकर्णीकडुन आताशा आपण जरा जास्तच अपेक्षा करतोय कोणास ठाऊक... सचिन तेंडुलकर सारख्या). पण स्वभावातला/ भाषेतला शहरीपणा, त्यातुन गावात वावरताना येणारा अनैसर्गिकपणा, फार ताणून न धरण्याची वृत्ती आणि या सर्वांवर उठून दिसणारी संवेदनशीलता हे सगळे रंग अतुल कुलकर्णीने चोख दाखवलेत.

काही प्रसंग योग्य परिणाम साधून जातात. काही प्रसंग गालातल्या गालात हसवतात. तर काही अगदी खदखदून. पण पात्रांना जेवढा उठाव आहे, तेवढा सर्वच प्रसंगांना मात्र येत नाही. Documentary ‘काढताना’ निवेदनातून येणारे काही प्रसंग अचानक येतात. काही अनावश्यक वाटतात. काही विसरले जातात. पण प्रत्येक प्रसंग साधा-सरळ ठेवल्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन करायला हवं.

सुधीर पळसानेचा कॅमेरा गावातलं वातावरण छान टिपतो. मराठीत अभावानेच दिसणारी रात्रीचे प्रसंग काळ्याऐवजी निळ्या रंगात दाखवणारी film वापरल्याने रात्रीचे प्रसंगही छान चित्रित झाले आहेत. १-२ प्रसंगात मात्र दृश्ये धूसर दिसतात.

मंगेश धाकडेचं पार्श्वसंगीत उत्कृष्टच. ग्रामीण बाज नेमका पकडतानाच वाहवून न जाता काही प्रसंग संगीत अजिबात टाळून परिणामकारक केलेत (उदा. वळू पकडला जातो तो प्रसंग).

बरेच चांगले मराठी चित्रपट मध्यंतरानंतर आदर्शवादाच्या किंवा बोधवादाच्या मागे हरवून परिणामशून्य होतात. इथेच वळू सरस ठरतो. अनेक मोह टाळून रोजच्या जीवनातल्या सरळ, विसंगत वास्तवाची कास चित्रपट शेवटपर्य़ंत टिकवून धरतो. जे काही सुचवायचं आहे ते कसलाही आव न आणता अलगदपणे सांगून जातो.

सुरवातीस सुटया-सुटया प्रसंगांचं शेवटी आपसूक एक सुसंगत कोलाज बनत जातं. सरपंचांचं अवघडलेपण राजकारणातील नव्या आव्हानामुळे, तर आबांचं अवघडलेपण योग्य संधी न मिळाल्याने, शिवा-सांगीची निराळीच घुसमट तर भटजींचं दु:ख आणखी वेगळं. वेडी जनाई कसल्याशा अगम्य भूतकाळाने अवघडलेली. तर चंद्री गाय वात्सल्याच्या चाहुलीने अवघडलेली. प्रत्येकाचं हे वेगवेगळं वैयक्तिक अवघडलेपण हळूहळू गावाचं सर्वव्यापी अवघडलेपण बनत जातं. आणि वळूच्या स्वातंत्र्याचा शेवट हे त्याचं सामायिक उत्तर ठरत जातं. शेवटी वळू जखडला जातो. काही गुंते त्यामुळे सुटतात. काही त्याशिवाय सुटतात. काही आपोआप सुटतात. तर काही नवीन तयार होतात. चित्रपट संपतो. आयुष्य चालू रहातं.

गेली अनेक वर्षे अवघडलेला मराठी चित्रपट अलिकडे मोकळा होतोय. ‘वळू’ सर्वांनी पहायलाच हवा. केवळ मराठी चित्रपट म्हणून नव्हे. तर दर्जेदार चित्रपट म्हणून.

- नीरज (२९ जानेवारी, २००८)

8 comments:

Yogesh said...

mast re neeraj. mala pan ha chitrapat khoop awadala.

Anonymous said...

haven't seen it yet
but hope to see it soon hope they will put a nice pirated copy up!

-Jay

Anonymous said...

Good review of Valu. Very well written. I haven't seen the film yet. Hope to catch it before it goes.
- Namita

जगदीश said...

Neeraj,
aajach Valu baghitla. ekdam bhari! Pot dhar-dharun haslo. tuzya review mule cinema pahanyachi gadbad keli.maja aali. valu mule aajcha ravivar mast gela.

-jagdish & ashwini.

Lalit said...

Neeraj,

Are khoop changale lihilay tu. Ekhaada Muralelaa Chitrpat Samikshakach watatoy. I agree with your comments. Definately.. "VaLu" can be considered as a benchmark in which more focus is given on individual characters (Vyaktirekha) and not any philosophical story.. and yet have a good impact on the viewers.

स्नेहा said...

yala mhantat PARIKSHAAN.....
manala bhidu...
vachaya maja ali ani kahi goshti navin kalalaye (ratri che chitrikaren vagaire)...
ter mag ata pudhchi prabhat kahi hotey???
kalava nakki...
(ya veli kahi KHATAKLE nahi, pudhchya veli kahi khataklyas nakki sangitle jail...)
aso...
suruvaat jhakkas ch jhali...

Unknown said...

Neeraj,

First i would like to thank you for giving such a nice description/explation etc. about the movie.By reading it i can say you can
too become the director/story writter of a movie. It seems like you have good knowledge about the technical/behavioural/functional aspects of the movie. By the way i have too seen this movie in the past and i liked it very much.

--Anil Mohakar

Amol said...

Priya Niraj,

Mala ha chitrapat khoop avadala. Agadi sadha sopa khoop hasavanara... pan ek nishchit sandesh denara...

Mala VALU he eka mukta, swachhandi ayushya jaganarya manasache pratik vatata...Samajik chaliriti, chaukati yachya palikadacha...Pan asha ayushyakade baghana kinva samajoon ghevoon te swikarana he bahuntashi lonkana awaghad hota ani awaghad hovoo lagata ani mag lavakarach tyala bandhan ghatala jata...Prashanche mool swatamadhye na shodhata mag ashya tisaryach mukta jeeva'la doshi tharavoon tyacha anand hiravala jato.... :)

Galib'ne mhatalach ahe -
Isake dushman he hajar
Adami achha hoga :)