Sunday 27 April, 2008

वास्तुपुरुष - पडद्यावरची कादंबरी

साहित्याच्या प्रांतात जसा 'कला ही कलेसाठी का जीवनासाठी' हा वाद न संपणारा आहे, तसाच 'चित्रपटाने करमणूक करावी का बोध करावा' हा वाद देखील निरंतर आहे. पण कधीतरी 'रथचक्र' सारखी एखादी कादंबरी असा काही उत्कट, सलग आणि सच्चा अनुभव घेऊन येते की हा सगळा वादच निरर्थक होऊन जातो. कलाकृती ही अनुभवण्यासाठी एवढं एकच उत्तर उरतं. अगदी असाच, जणु एखादी परिणामकारक कादंबरी वाचावी तसा, अनुभव 'वास्तुपुरुष' पाहताना येतो.

पूर्ण तीन तास लांबीचा हा चित्रपट वरवर पहावा तर अगदी संथ (कादंबरीच्या लयीचा) आणि नाट्यमय घटना, योगायोग, कलाटणी वगैरे सहसा अपेक्षित गोष्टींचा अजिबात समावेश नसलेला. पण कुठल्याही साध्या सरळ गोष्टीलाही वास्तव जीवनात जसे अनेकविध सुसंगत विसंगत पदर असतात, तसे कथानकाचे अनेक अंत:प्रवाह विसंवादी पात्रांद्वारे अलगदपणे समोर येत रहातात आणि चित्रपटाची पूर्ण चौकट भरून टाकतात.


मुंबईत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल डॉ. भास्कर इनामदार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर होतो आणि ४० वर्षांनी अचानक डॉक्टरांना गावची ओढ लागते. अमेरिकेहून सहकुटूंब भेटायला आलेल्या मुलासोबत ते गावी जातात. गेली अनेक वर्षे वापरात नसलेल्या त्यांच्या पडक्या वाड्याचा दरवाजा उघडतात. आणि आठवणींचा बांध फुटतो. इनामदारांच्या भरल्या वाड्यातला विद्यार्थी भास्कर दिसायला लागतो.

भास्कर स्वभावाने शांत समजूतदार आणि अभ्यासात हुशार. पण भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात उसळणारी वादळे चेहर्‍यावर येऊ न देणारा. आई, बाबा, काका, दादा, कृष्णाताई या सर्वांची वेगवेगळ्या कारणांनी होणारी ओढाताण तो पहातो. पण समोरासमोर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. संपूर्ण चित्रपटभर तो एक निरीक्षक (observer) म्हणून वावरतो. त्याच्या नजरेतून आपणही घरातील आणि गावातील एक एक व्यक्ती पहात जातो.

इनामदारांचा वाडा हा या चित्रपटातील एक पात्रच आहे. (वास्तुपुरुष हे नाव त्या दृष्टीने अत्यंत सार्थ आहे.) संजय मेमाणे यांच्या कॅमेर्‍याने आणि श्रीरंग उमराणी यांच्या पार्श्वसंगीताने हे पात्र अगदी जिवंत करून ठेवलंय. एवढं परिणामकारक आणि नेमकं छायाचित्रण मराठीत मी तरी क्वचितच पाहिलंय. काश्मिर-स्वित्झर्लंड ची निसर्गशोभा चित्रित करणं वेगळं आणि एका जुन्या प्रशस्त वाड्याला त्याच्या बर्‍यावाईट गुणवैशिष्ट्यांसह चित्रित करून स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळवून देणं वेगळं. चित्रपटातील दोन्ही गाण्यांनी ग्रामीण लोकसंगीताचा बाज छान उचलला आहे. (अतुल कुलकर्णीने मात्र त्यांत थोडी over-acting केली आहे.)


पूर्वजांनी केलेल्या कर्मांमुळे हा वास्तुपुरुष अशांत झाला आहे आणि त्यामुळेच आजचे कठीण दिवस बघावे लागत आहेत अशी पारंपारिक श्रद्धा भास्करच्या आईची आहे. काहीही करून भास्करला डॉक्टर करायचा ध्यास तिने घेतला आहे. डॉक्टर होऊन भास्कर समाजाची सेवा करेल तेव्हाच हा वास्तुपुरुष शांत होईल अशी तिची धारणा आहे. उत्तरा बावकरांनी ही व्यक्तिरेखा ज्या ताकदीने उभी केली आहे ते पाहून मराठीतील (रंगभूमीमुळे तयार झालेली) अभिनयाची अफ़ाट गुणवत्ता दिसून येते.

स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या संधीसाधु प्रवृत्तीमुळे व्यवहारशून्य ठरू लागलेला गांधीवादी आदर्शवाद आणि न पटणारा व्यवहारवाद यांच्या कात्रीत अडकून हतबल झालेले वडील आणि त्यांची अगतिकता सदाशिव अमरापूरकरांनी नेहेमीच्या सहजपणे उभी केली आहे.

काकांच्या भूमिकेत रवींद्र मंकणींनी कमालच केली आहे. एकीकडे इनामदारांच्या गतवैभवाचा दुराभिमान व भविष्याबाबतचा भाबडा स्वप्नाळूपणा तर दुसरीकडे जुन्या काळचा प्रातिनिधिक घरगुती प्रेमळपणा त्यांनी नुसता ’होsSS’ असा हेल काढून पेललाय. दुर्बळ मनाचा आणि निराशेमुळे सत्यापासून दूर पळणारा दादा (तेव्हा star नसलेल्या) अतुल कुलकर्णीने चपखल रंगवलाय. अंथरूणाला खिळून असणारी म्हातारी आज्जी आणि घरातला विश्वासू पण विक्षिप्त नोकर उत्तम वातावरण निर्मिती करतात. रेणुका दफ़्तरदार यांची कृष्णाताई देखील उत्तम (मात्र काही ठिकाणी त्यांचे संवाद स्पष्ट ऐकू येत नाहीत).

तरूण भास्करच्या भूमिकेत सिद्धार्थ दफ़्तरदार तर डॉ. भास्कर यांच्या भूमिकेत लेखक महेश एलकुंचवार आहेत. तरूण भास्करचा चेहरा निर्विकार ठेवणे हे व्यक्तिरेखेनुसार गरजेचे असले तरी सिद्धार्थचा अभिनयातील तसेच संवादातील नवखेपणा जाणवतो. एलकुंचवार मात्र (त्यांची पहिलीच भूमिका असूनही) डॉक्टरांच्या भूमिकेला योग्य न्याय देतात.

पण कादंबरी जशी कितीही पात्रे आली तरी शेवटी लेखकाची असते, तसा वास्तुपुरुष देखील खर्‍या अर्थाने सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीचा आहे. सनसनाटी काहीतरी घडवून आणण्याच्या अनेक संधी संपूर्ण चित्रपटभर उपलब्ध असूनही त्यांनी कुठेही तोल जाऊ दिलेला नाही. वास्तव आयुष्याचा (प्रसंगी नीरस) वेग त्यांनी शेवट पर्यंत टिकवलाय. एकेक व्यक्तिरेखा त्या त्या वैशिष्ट्यांसह उभी करताना कोणत्याही एका बाजूच्या समर्थनाच्या किंवा उदात्तीकरणाच्या भानगडीत ते पडलेले नाहीत. सर्व प्रसंगातून एक सलग परिणाम घडवण्यात ते यशस्वी ठरतात.



चित्रपटाचा खरा उत्कर्षबिंदू मात्र अंतर्मुख विद्यार्थी भास्करने तेव्हा न दिलेल्या प्रतिक्रिया डॉ. भास्करांनी त्या त्या frame मध्ये शिरून ४० वर्षांनी पूर्ण करण्यात आहे. आई, वडील आणि दादा यांना एकाच मोजक्या वाक्यात आणि वास्तुपुरुषाला तर नुसती धाव घेऊन दिलेल्या या संयत प्रतिक्रिया एखाद्या सुवासिनीला कुंकू लावून तिच्या सौभाग्याचा गौरव करावा तशा प्रतिकत्मक आणि सूचक आहेत. (चित्रपट तिसर्‍यांदा पाहिला तेव्हा कुठे मला हे कळलं.)

चित्रपटाच्या शेवटी वाड्याच्या जागी नवीन रूग्णालय उभारायचं डॉक्टर ठरवतात आणि वास्तुपुरुषाची खर्‍या अर्थाने शांत होते.

वास्तुपुरुष हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. अर्थात कादंबरी हा प्रकार काही सगळ्यांनाच रूचत नाही. पण ज्यांना रूचतो त्यांना वास्तुपुरुष पाहताना विलक्षण उत्कट अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.


*खरंतर वास्तुपुरुष २००३ सालचा. त्यामुळे आता ५ एक वर्षांनी यावर लिहायचे वास्ताविक काही प्रयोजन नाही. पण चित्रपट इतका आवडला की रहावलं नाही.

*२००३ साली निवड समितीने National Award for Best Film म्हणुन एकमुखाने वास्तुपुरुषची निवड केली होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे (Censor Board Certificate २००२ सालचे होते का असेच काहीतरी) तो प्रस्ताव रद्द झाला. २००४ साली ’श्वास’ने याची भरपाई केली.

- नीरज (२७ एप्रिल, २००८)

3 comments:

kaps said...

Hi Niraj,
chaan ahet.
somehow I was unable to read it. Kahi marathi shabda clear nahiyet. bahutek mazya browser cha problem asava.

Baki Vastupurush also went into my "favorite" list of movies.
Yes, atishay masta movie aahe.

"Aai" baddal somehow I dont agree with your comment, that she is afraid of the Vastupurush.

Actually she is the one who knows "Education" can only bring the change for their fates. She knows the youngest son is capable and deserve the needed support at any cost.
On other side she is also a wife, a sister in law, in spite of difficulties knowing her limitations well she supports her son.

Good blog, keep writing.

-Kapilesh

Arun Tingote said...

great niraj... me chitrapat pahila hota mala aawadla hota...tuzya mule to aadhik kalala.. thank's...ur write style and sense of moive suparb.... shubbechansah... arun

अश्विनी said...

नीरज,

परवा हा चित्रपट पहिला आणि आज तुझा ब्लॉग नव्याने वाचला. चित्रपट कमालीचा आवडला.

> चित्रपटाचा खरा उत्कर्षबिंदू मात्र अंतर्मुख विद्यार्थी भास्करने तेव्हा न दिलेल्या प्रतिक्रिया डॉ. भास्करांनी त्या त्या frame मध्ये शिरून ४० वर्षांनी पूर्ण करण्यात आहे.

खरंय. त्यातला पहिला प्रसंग पहिला तेव्हा मी अवाक झाले :)

महेश एलकुंचवारांना भास्कर देशपांडेंच्या भूमिकेत पाहायला छान वाटते. उत्तरा बावकरांनी साकारलेली व्यक्तिरेखा तर कमालच.

काही पात्रे आणि प्रसंग मात्र अस्थानी वाटले. पण एकंदरीत, चित्रपट खूपच आवडला. आणि तू या ब्लॉग मध्ये त्यावर लिहिलेलेही.

-अश्विनी